क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी; खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र

मुंबई, प्रतिनिधी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित लोकप्रिय मराठी मालिका बंद करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्टार प्रवाह वाहिनीला लिहिलेल्या खुल्या पत्राद्वारे केली आहे.
समाजप्रबोधन, स्त्री शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या मालिकेचा प्रवास थांबवण्याचा निर्णय दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पत्राच्या सुरुवातीला “जय ज्योती, जय क्रांती” असा संदेश देत मोहिते पाटील यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजसुधारणेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारी ही मालिका प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत होती.
अशा वेळी मालिका बंद होणे ही केवळ एका दूरचित्रवाणी मालिकेची समाप्ती नसून समाजसुधारकांच्या विचारांना मिळणाऱ्या व्यासपीठावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.मालिका बंद करण्यामागे टीआरपी हे कारण सांगितले जात असल्याचे समोर येत असले तरी ते पूर्णपणे पटणारे नसल्याचे त्यांनी नमूद केले.
आजही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक ही मालिका आवर्जून पाहतात, तिच्यावर चर्चा करतात आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख करून देण्याचे महत्त्व मान्य करतात. त्यामुळे केवळ टीआरपीच्या निकषावर असा निर्णय घेण्यात आल्याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे.
यासोबतच, अनेक काल्पनिक आणि साचेबद्ध सासू-सुनेच्या मालिका वर्षानुवर्षे सुरू राहतात, मात्र इतिहास, सामाजिक परिवर्तन आणि प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या मालिका अल्पावधीत बंद होतात, हा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे या निर्णयामागे इतर कोणते कारण किंवा दबाव आहे का, याबाबतही समाजात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
खा. मोहिते पाटील यांनी अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे उदाहरण देत, “स्वराज्यरक्षक संभाजी” सारखी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मालिका ज्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली, त्याच धर्तीवर “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” ही मालिका देखील कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रसारित करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे केवळ एका समाजघटकाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या विचारांचा प्रसार सातत्याने होत राहणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. त्यांचे कार्य, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याने संबंधित वाहिनी आणि निर्मात्यांनी मालिका बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून ती सुरू ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, या खुल्या पत्रानंतर सामाजिक, शैक्षणिक आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेतील कार्यकर्त्यांमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली असून, मालिकेच्या भवितव्याबाबत आता स्टार प्रवाह वाहिनीची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







