*अकलूज -वेळापूर रस्ता* *प्रवाशांचा जीव टांगणीला* *रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते* *क्रमशः भाग -11.*
अकलूज (प्रतिनिधी )एकीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘समृद्धी’ आणि ‘हायवे’च्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे अकलूज ते वेळापूर या महत्त्वाच्या मार्गावर प्रवाशांना मात्र नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
या रस्त्याची अवस्था पाहता ‘रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता’ असा प्रश्न पडण्यापेक्षा, हा मार्ग खरोखर माणसांसाठी आहे का? असा संतापजनक सवाल आता प्रवासी विचारू लागले आहेत
.अकलूज-वेळापूर हा केवळ दोन गावांना जोडणारा रस्ता नाही, तर हा या भागातील अर्थव्यवस्थेची धमनी आहे. मात्र, सध्या या धमनीला ‘खड्ड्यांचा कॅन्सर’ झाला आहे. रस्त्यावरील डांबर कधीच गायब झाले असून, उरला आहे तो फक्त खडीचा खच आणि जीवघेणे खड्डे. दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते; थोडी जरी चूक झाली तरी थेट दवाखान्याची पायरी चढावी लागते.
गेल्या महिनाभरात या मार्गावर झालेल्या छोट्या-मोठ्या अपघातांची गणतीच नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एसी केबिनमध्ये बसून नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
रस्त्याची वाट लागलेली असताना केवळ ‘मलमपट्टी’ म्हणून खड्ड्यात खडी टाकण्याचे नाटक केले जाते. दोन ट्रक गेले की ती खडी पुन्हा बाहेर येते आणि अपघाताला निमंत्रण देते.
हा केवळ कामाचा दर्जा खालावल्याचा प्रकार नसून, जनतेच्या कररूपाने आलेल्या पैशांची ही दिवसाढवळ्या चाललेली लूटच आहे.
वेगवेगळ्या प्रकारची वाहतूक या मार्गावरून होत आहे. ही वाहने खड्ड्यांतून जाताना कोणत्याही क्षणी बाजूच्या वाहनावर कोसळतील, अशा अवस्थेत डुलत असतात. रात्रीच्या वेळी तर हा प्रवास म्हणजे ‘यमराजाशी गाठ’ असल्यासारखा वाटतो. पथदिव्यांचा अभाव आणि धुळीचे लोट यामुळे समोरचे काहीच दिसत नाही.
निवडणुकीच्या काळात रस्त्यांच्या नावाने मते मागणाऱ्या पुढाऱ्यांना आता या खड्ड्यांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न वेळापूरकर विचारत आहेत.
सामान्य जनतेच्या पाठीचे मणके खिळखिळे होईपर्यंत आणि गाड्यांचे टायर फाटेपर्यंत लोकप्रतिनिधी गप्प का?
अकलूज-वेळापूर मार्गाची दुरवस्था ही केवळ रस्त्याची समस्या नाही, तर ती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे. रोज शेकडो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत असताना संबंधित यंत्रणा मात्र तात्पुरत्या मलमपट्टीवर समाधान मानत आहे.
विकासाच्या मोठमोठ्या घोषणा आणि प्रत्यक्षातील विदारक वास्तव यातील दरी आता स्पष्टपणे दिसू लागली आहे.या मार्गाची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून दर्जेदार कामाची हमी देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा वाढत्या अपघातांना आणि जनतेच्या संतापाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.
नागरिकांचा जीव धोक्यात घालून कोणताही विकास मान्य होऊ शकत नाही—आता तरी ठोस कृतीची अपेक्षा आहे.
*क्रमशःभाग -11.
#अकलूजवेळापूररस्ता#खड्ड्यांचाराजा#रस्त्यावरमृत्यूचीछाया#जनतेचाआक्रोश#रस्तादुरुस्तकरा#प्रशासनजागेहवा#SafeRoads#RoadSafety#FixTheRoad#Velapur# अकलूज
🚨 अकलूज – वेळापूर रस्ता : संघर्ष सुरूच 🚨
अकलूज – वेळापूर रस्त्यावरील गंभीर समस्यांविरोधात १५ फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करत आहे. 👥 नागरिकांची व्यथा स्पष्ट आहे —“दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा संघर्ष!”खड्डे, अपूर्ण काम, धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. 🙏 अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले —“कुणीतरी आमचा आवाज उठवतोय!” 🔥 आम्ही थांबणार नाही!रस्ता पूर्ण आणि सुरक्षित होईपर्यंत सातत्याने बातम्या प्रसिद्ध करत राहू .➡️ तुमचे अनुभव, तक्रारी व सूचना आम्हाला पाठवा 📲 ७८४१८४७४५८ एकत्र येऊया, आवाज बुलंद करूया! 💪







